blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १४

आपण या पुर्वी  च्या काही भागात सेंद्रिय कर्ब व त्याची  जमिनीला व द्राक्ष वेलीस किती गरज आहे हे पाहिले आहे, उच्च प्रतीची द्राक्ष घड निर्मिती करण्यासाठी   अनेक घटक कारणीभूत असतात त्यातीलच विविध प्रकारची अन्नद्रव्ये लागतात,  प्रमुख अन्नद्रव्यामध्ये  नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य घटक आहेत त्याच बरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक हे दुय्यम घटक व ईतरही अनेक सुक्ष्म अन्नद्रव्ये ही थोड्या अधिक प्रमाणात लागतात. द्राक्ष वेलीच्या वाढीच्या  विविध  अवस्थांमधे वेगवेगळ्या अन्न घटकांची  गरज भासत असते . मुळांची चांगली वाढ होण्यासाठी स्फुरद लागते तर वेलीची शारिरीक वाढ  व शेंडा व काडीची निर्मिती करण्यासाठी नत्र + स्फुरदाची गरज असते व घडांचा विकास व वाढ होण्यासाठी नत्र + पालाश या घटकांची गरज नेहमी लागत असते. सर्वसाधारणपणे  थाॅमसन, शरद सिडलेस, ताश गणेश, सोनाका आदी जातींमधे हेक्टरी विस ते पंचवीस टन चांगल्या प्रतीच्या द्राक्ष घडांचे  उत्पादन मिळते, तथापी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जातीपरत्वे आपल्याला  किती उत्पादन घ्यायचे आहे त्यानुसारच किती  (अन्नद्रव्ये ) खते द्यावयाची आहेत ते ठरवावे लागते, आता आपण थोड्या वेगळ्या बाजूने विचार करूयात, द्राक्ष घडांचे शास्त्रीय पृथ्थकरण केल्यास असे  समजते की द्राक्ष मण्यांमधे एकूण वजनाच्या 84.5 % पाणी व 14.5 % घन पदार्थ आढळून येतात, याचा अर्थ असा की द्राक्ष मण्यांमधे पाणी सोडून 14.5 % घन पदार्थाची निर्मिती होणे गरजेचे आहे, व हे घन पदार्थ विविध प्रकारच्या अन्न घटकापासूनच तयार होत असतात (म्हणजे एकूण घन पदार्थाच्या वजना इतके खत देने असा अर्थ नाही) एप्रिल छाटणी व ऑक्टोबर छाटणी अश्या दोन वाढीच्या कालखंडात ही अन्नद्रव्ये पुरवठा करावी लागतात, या दोन्ही वेळेस मिळून द्यावयाची एकून  खंतापैकी एप्रिल छाटणी वेळेस आर्धे नत्र व आर्धे स्फुरद  द्यावे लागेल व बाकी आर्धे नत्र आर्धे स्फुरद व संपूर्ण पालाश हे ऑक्टोबर छाटणी वेळेस दिले पाहिजे, सर्वसाधारणपणे ऑक्टोबर छाटणी पुर्वी एका द्राक्ष वेलीच्या संपूर्ण मुळासकट भट्टीत जाळून केलेल्या कोरड्या  राखेच्या वजना  इतकी एकूण अन्नद्रव्ये त्या वेलीस लागतात. मग आता कोनत्या बागेस किती अन्नद्रव्ये किंवा खते द्यायचे ते त्या  द्राक्ष बागेच्या वय व विस्तारावर अवलंबून राहील, या शिवाय जमिनीत पहिली किती अन्नद्रव्ये शिल्लक आहेत याचाही विचार करावा लागेल, या साठी ऑक्टोबर छाटणी पुर्वीच बागेतील माती व आपण बागेस नियमित देणारे पाणी या दोन्हीं ची प्रयोगशाळेत तपासणी करून घेने महत्वाचे ठरते. या पुर्वीच अनेक द्राक्ष तज्ञांनी बागेस एप्रिल व ऑक्टोबर वेळेस मिळून एन पि के  ची मात्रा किती द्यायची हे ठरवले आहे,  हेक्टरी 900 किलो नत्र, 500 किलो स्फुरद व 700 किलो पालाश एवढी या तिनच घटकांची मात्रा लागते, मग माती परिक्षणा मधे जमिनीत ऊपलब्ध एन पी के ची मात्रा किती आहे हे कळाल्या नंतर तेवढी मात्रा एकूण शिफारस केलेल्या मात्रेतून वजा करावी लागेल, या शिवाय बागेस  नियमित दिले जाणारे पाणी ही परिक्षण करून घेने महत्वाचे ठरेल,  कारण आता पाणीही पुर्वी सारखे स्वच्छ व सोज्वळ राहिलेले नाही,  विशेषत थेट नदी किंवा कॅनाॅलच्या ही पाण्यात नत्र, स्फुरद,  पालाश, कॅल्शियम, सोडीयम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक मुक्त आयन्स स्वरूपात व मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, या सगळ्या मुद्द्यांवरच   नेमकी कोनती अन्नद्रव्ये किती प्रमाणात व कधी द्यावित, या सगळ्याचा विचार आपण पुढील भागात विचार करणार आहोत. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्